कास पठारावर हवाई धावपट्टीची छ उदयनराजेंची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी दिल्लीत भेट घेऊन चर्चा

1010
Adv

महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातुन महाबळेश्वर, पांचगणी, कास येथे सरासरी३५ ते ४० लाख पर्यटक भेट देत असतात यामध्ये गतीमानता येण्याकरीता सातारा किंवा परिसरात अॅरो स्पॉट निश्चित करून, एअर स्ट्रीप उभारणे संदर्भात नागरी हवाई उड्डाण मंत्री ना.ज्योतिरादित्य शिंदे यांचेशी आज विस्तृत चर्चा झाली.

थंड हवेची ठिकाणे म्हणून जगविख्यात असलेले महाबळेश्वर-पांचगणी, जागतिक वारसा लाभलेले कास पठार, आणि सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचा वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे.उडान योजनेमधुन सातारा-कास येथे सुयोग्य ठिकाणी एअरस्ट्रीप उभारण्याची शक्यता पडताळण्यासाठी, तज्ज्ञांचे पथक पाठवून, त्यानुसार एअर स्ट्रीप उभारणेची कार्यवाही नक्कीच सुरु करण्यात येईल अशी ग्वाही ना. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे.

केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ना. ज्योतिरादित्य शिंदे यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली. ऐतिहासिक, आध्यात्मिक संदर्भाने महाराष्ट्रातील पर्यटनाबरोबरच आणि देशातील अनेक व्यक्ती आपल्या कुटुंबासह सातारा जिल्ह्यात येत असतात. सर्वसाधारण अंदाज पहाता, सुमारे ४० लाख पर्यटक येत असतात.सध्या सातारा जिल्ह्यातील उत्तर-पश्चिम भागातील स्थळांना भेट देण्यासाठी रस्ते वाहतुकीचा उपयोग होत आहे. त्यालाच जर एअर स्ट्रीपची जोड दिली तर भेट देणाऱ्या व्यक्तींचा वेळ वाचण्याबरोबरच पर्यटक अधिकाधिक आकर्षित होणार आहेत.

सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. त्यामुळे या शहराला आणि सातारा जिल्ह्याला एक वेगळे महत्व आहे. या सर्व बाबींचा विचार करून, दुरदृष्टीकोनामधुन, सातारा येथे योग्य ठिकाणी एअर स्ट्रीप उभारणेबाबत आम्ही मागणी केली आहे. सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे तसाच अध्यात्मिक सांस्कृतिक वारसा आहे. याठिकाणी जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. पर्जन्यमानाची विषमता म्हणजेच पश्चिमेकडे अति पर्जन्य आणि पूर्वेकडे कोरडा भाग हे सातारा जिल्ह्याचे वैशिष्ट आहे. भौगालिक दृष्ट्याही सातारा जिल्हा डोंगर दऱ्यांचा जिल्हा आहे. पाचगणी येथे आशिया खंडातील सर्वात मोठे टेबल लॅन्ड आहेच शिवाय पाचगणी हे एक दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिध्द असलेले शैक्षणिक केंद्र आहे.

तसेच या ठिकाणी कोयना व्याघ्र प्रकल्प / अभयारण्य साकारत आहे. याच भागात, कोयना, उरमोडी, धोम, बलकवडी, महू हातगेघर, अशी धरणे आहे. मोठी धरणे असल्याने याठिकाणी सी-प्लेन धावपट्टी उभारता येईल याची सुध्दा चाचपणी होणे गरजेचे आहे. घाटाई ते महाबळेश्वर नवीन रस्ता अस्तित्वात आला आहे. रस्ते वाहतुकीबरोबच अन्य वाहतुक सुरु होणे ही सातारा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणारी अशी विविध चर्चा देखिल यावेळी ना. ज्योतिरादित्य शिंदे यांचेबरोबर झाली.

किल्ले अजिंक्यतारा, किल्ले प्रतापगड आणि सज्जनगड या ठिकाणी रोप-वे उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच ना.नितिन गडकरी यांचे रस्ते विकास मंत्रालयाला दिलेले आहेत. त्या प्रस्तावाची छाननी सुरु आहे. नजीकच्या काळात, या तीनही ठिकाणी रोप वे उभारला जाणार आहे. सातारा-कास या ठिकाणी एअरस्ट्रीप बांधल्यास, पर्यटक, भाविक, नागरीक यांचा वेळ वाचण्याबरोबरच त्यांना अधिक सुखद पर्यटनाचा आनंद मिळणार आहे. विकासाला नवे आयाम मिळणार आहेत. पर्यटनपुरक व्यवसायांमध्ये वाढ होईल, त्याचा लाभ अंतिमतः सातारकर नागरीकांना मिळेल म्हणूनच केंद्राच्या उडान योजने अंतर्गत एअर स्ट्रीप बांधणेबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे.

आमच्या प्रयत्नांना सर्वांच्या सहकार्याने निश्चितच यश मिळेल असा आत्मविश्वास आहे.

Adv