अजिंक्यतारा रोपवे उभारणीसाठी केंद्र निधी देणार नितीन गडकरी यांची ग्वाही

578
Adv

नवी दिल्लीत आज भुपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग वाहतुक मंत्री ना. नितिन गडकरी यांची भेट घेतली आणि केंद्र शासनाच्या माध्यमातुन अजिंक्यतारा येथे उभारण्यात येणाऱ्या रोप वे बाबत विस्तृत चर्चा केली. लवकरच केंद्राच्या निधीतुन, नगरपरिषदेच्या मार्फत अजिंक्यतारा येथील रोप-वे च्या उभारणीस सुरुवात होईल.

किल्ले अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईदेवी परिसर ते किल्याच्या पूर्व भागाकडील खालची मंगळाई या हवाई मार्गावर रोप-वे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे डबल केबलद्वारे या दोन्ही ठिकाणांचे परिसरात एकाच वेळी दोन्ही बाजुंकडून आठ आसन क्षमतेच्या दोन रोप-वे ट्रॉलीचे आगमन निगमन होणार आहे त्याकरीता आवश्यक जागा उपलब्ध होत आहे. एकूण ९२ कोटी रुपयांच्या या केबल रोप-चे प्रकल्पाची उभारणी केंद्राच्या निधीमधुन करण्यात येईल अशी ग्वाही भुपृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना. नितिन गडकरी यांनी दिली आहे.

किल्ले अजिंक्यतारा या ऐतिहासिक वास्तुला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. याच किल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ वास्तव्य होते. या किल्यावर सुमारे सात तळी असुन, या तळ्यातील झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न पर्यावरण आणि इतिहासप्रेमीं मदतीने केला जाणार आहे.

किल्यावरील राजसदरेचा चौथरा अद्याप मजबुत आहे, तसेच किल्यावर श्री मंगळाईदेवी मंदिर आणि दक्षिणाभिमुखी मारुतीचे मंदिर अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. किल्याच्या भक्कम असलेल्या प्रवेश व्दारापासून पायऱ्यांचा भाग तसेच तेथील बुरुज प्रेक्षणीय आहे. सुमारे ७० एकरापेक्षा जास्त भुभाग किल्याला लाभला असून, बहुतांशी भाग सपाट आहे. अनेक स्थित्यंतर पाहीलेल्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या अजिंक्यतारा किल्याचा सातारकरांचा अभिमान आहे.

किल्ले अजिंक्यताऱ्यावरच छत्रपती राजाराम महाराज यांनी रायगडावरुन, स्वराज्याची राजधानी स्थलांतरीत केली होती. जाज्वल्य इतिहास असलेल्या आणि ऐतिहासिक पाउलखुणा उमटलेल्या या किल्यावर आजही हजारो व्यक्ती, इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि भाविक नेहमीच भेट देत असतात. नवरात्रातील सर्व दिवसांत किल्यावरील मंगळाईचे दर्शनाला
नेहमीच गर्दी होत असते.

परगांवचे अनेक पर्यटक अजिंक्यतारा किल्यास भेट देण्यास उत्सुक असतात. किल्याच्या दरवाजापासून थोडीशी चढण आणि पायऱ्या असल्याने वयस्कर नागरीकांना आजही किल्यावर जाता येत नाही. केबल रोप वे मुळे या सर्वांना कमी वेळेत आणि कमी श्रमामध्ये किल्यावर जाता व येता येणार आहे. इतिहास तज्ज्ञांशी विचार करुन या किल्यावर ऐतिहासिक पर्यटन सुरु करण्याच्या कार्याला रोप-वे मुळे मदत व गती मिळणार आहे.

सातारा जिल्हा पर्यटनास मोठा वाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा या किल्यावर रोप-वे ची उभारणी केंद्राच्या निधीमधुन करण्यात येईल त्याबाबतची कार्यवाही लवकरच आपणास अवगत केली जाईल अशी ग्वाही देखिल ना. नितिन गडकरी यांनी दिली आहे.

Adv